टी-20 विश्वचषक स्पर्धा भारत होणार नसली, तरी बीसीसीआयला होणार कोट्यावधींचा फायदा


नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. भारतात ही स्पर्धा पार पडणार होती, पण कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या विश्वचषक स्पर्धेचे सर्व नियोजन यूएई आणि ओमानला हलविण्यात आले आहे. या स्पर्धेची तिकिटे विकण्याचे अधिकार बीसीसीआयने ओमान आणि ईसीबीला दिले आहेत. या स्पर्धेच्या तिकीट विक्रीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळेल, असा आशावाद बीसीसीआयने व्यक्त केला आहे.

३९ सामन्यांचे आयोजन करण्यासाठी यूएई क्रिकेट बोर्डाला सात दशलक्ष डॉलर्स दिले जाणार आहेत. तर ओमान क्रिकेट बोर्डला पहिल्या फेरीच्या सहा सामन्यांसाठी तीन कोटी रुपये दिले जातील. असे असूनही, यातून १२ दशलक्ष डॉलर्सचा फायदा बीसीसीआयला होणार आहे. याबद्दल बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने सांगितले आहे.

बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने असेही सांगितले की, २५ दशलक्ष डॉलर (१ अब्ज ८६ कोटी रुपये) एवढा या स्पर्धेचा एकूण खर्च आहे. नियोजित खर्चापेक्षा १२ दशलक्ष डॉलर म्हणजे ८९ कोटी रुपये अधिक आहे. तसेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियातील होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेवर खर्च होणाऱ्या किंमतीपेक्षा हे अजूनही कमी आहे. बीसीसीआयने या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने युएई आणि ओमानमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीशी होस्टिंगच्या मुद्द्याबाबत बीसीसीआयने चर्चा केली होती. खेळाडूंची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे, असा आम्ही विचार केला. त्यामुळे आम्ही ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.

क्रिकबझच्या बातमीनुसार, दुबई, अबू धाबी आणि शारजाहमध्ये बीसीसीआय टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करत आहे. यासाठी, बीसीसीआय युनायटेड क्रिकेट बोर्डला १.५ दशलक्ष डॉलर (११ कोटी रुपये) आणि ऑपरेशनल खर्चासाठी ५.५ दशलक्ष डॉलर्स देईल. बीसीसीआय एकूण सात दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५२ कोटी रुपये देणार आहे. सामन्यादरम्यान आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवणे, हे युएई क्रिकेट बोर्डाचे काम असेल. बीसीसीआयने आपली तिकिटे ईसीबीला विकण्याचे अधिकार दिले आहेत, यामधून मिळणार सर्व नफा ईसीबीकडेच राहील.