नवाब मलिकांचा गंभीर आरोप; एनसीबी कार्यालयात अरबाज मर्चंटला घेऊन जाणारा मनिष भानुशाली भाजपचा उपाध्यक्ष


मुंबई – रविवारी पहाटेच्या सुमारास केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मोठी कारवाई केली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना या प्रकरणामध्ये एनसीबीने अटक केली होती. त्या क्रूझवर जाऊन तपासणी सुरु करत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत.

देशाचे राजीव गांधी पंतप्रधान असताना २३ ऑगस्ट १९८५ रोजी नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रापिस सब्सटंन्स अॅक्ट (NDPS) कायदा लागू करण्यात आला. राजीव गांधी यांची हा कायदा लागू करण्यामागे जी इच्छा होती ती अशी की देशाला नशामुक्त करण्यात यावे. यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) स्थापन करण्यात आले. या कायद्यानुसार राज्यांनाही अधिकार देण्यात आले. फक्त पोलिसांना अधिकार दिले, तर अनेक राज्यांमधील प्रकरण असेल तर कारवाईसाठी समस्या निर्माण होईल म्हणून केंद्रीय संस्था स्थापन करण्यात आली.

ही संस्था ३६ वर्षांपासून या देशात काम करत आहे. या तपास यंत्रणेने अनेक प्रकारच्या कारवाया करत ड्रग्ज रॅकेट उद्धवस्त केले आहेत. ३६ वर्षे या संस्थेचे कामकाज संशयाखाली नव्हते. या देशाचे सर्व जागरूक नागरिक, सर्व राजकीय पक्ष या संस्थेचे सन्मान करत आले असल्याचे असे नवाब मलिक यांनी म्हटले.

एनसीबीसाठी गेल्या एका वर्षभरापासून सर्व माध्यमांनी आपले प्रतिनिधी तयार करून ठेवले आहेत. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बिहारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आणि सीबीआयकडे हे प्रकरण देण्यात आले. त्यानंतर ड्रग्समुळे त्यांची हत्या केली गेली अशा बातम्या येऊ लागल्या. तेव्हापासून बातम्या पेरल्या गेल्या. बॉलिवूडला बदनाम करण्यात आले. त्यानंतर कलाकारांना समन्स देऊन बोलावण्यात आले. त्यानंतर असा समज निर्माण केला की संपूर्ण बॉलिवूड हे ड्रग्ज रॅकेटचे नेक्सस झाले असल्याचे मलिक म्हणाले.

याच मालिकेत क्रूझवर एनसीबीने ३ तारखेच्या संध्याकाळी छापा टाकला. त्यानंतर एएनआयने आपल्या माध्यमातून काही व्हिडीओ दाखवण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये एनसीबीने ज्यांना ताब्यात घेतले होते, त्यांचे फूटेज होते. झोनल संचालक यांनी त्याआधी ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचे म्हटले होते. एका व्हिडीओमध्ये एक अधिकारी आर्यन खानला एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनतर त्याच व्यक्तीचा आर्यनसोबत सेल्फी व्हायरल झाला. त्यानंतर एएनआयने दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून एक बातमी दाखवली की हा एनसीबीचा अधिकारी नाही. त्यामुळे ही व्यक्ती कोण हा प्रश्न निर्माण होत आहे.

हा एनसीबीचा अधिकारी नाही तर आर्यन खानला तो कार्यालयात कसा घेऊन गेला? याचे उत्तर एनसीबीला द्यावे लागेल. एएनआयच्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये अरबाज मर्चंटला घेऊन जाणारी व्यक्ती खोटी आहे. पहिल्या व्हिडीओतील व्यक्तीचे नाव केपी गोसावी आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव मनिष भानुषाली आहे. मनिष भानुषाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. मनिष भानुषालीचे फोटो पंतप्रधान मोदी आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबत आहेत. एनसीबीला सांगावे लागेल की त्यांचे आणि एनसीबीचे काय संबंध आहेत? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

एनसीबीने दावा केला आहे की आम्ही क्रूझवर छापा मारला. यासाठी तीन दिवस नियोजन करण्यात आले. ही कारवाई २६ अधिकाऱ्यांद्वारे केली गेली. ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचे एनसीबीने म्हटले होते. त्यानंतर ८ जणांना ताब्यात घेतल्याचे म्हटले. १० लोक असतील, तर त्यातील दोघांना सोडले असेल. आठ लोकांनाच ताब्यात घेण्यात आले होते, पण एनसीबीने आणखी दोघांना ताब्यात घेण्याचे षडयंत्र आखले होते, असे मलिक म्हणाले.

हे प्रकरण जेव्हा सुरु होते तेव्हा काही फोटो एनसीबीने क्राईम रिपोर्टसना दिले आणि त्यानंतर ते टिव्हीवर दाखवण्यात आले. एनसीबीने बातम्या पेरल्या. दिल्लीच्या एनसीबीद्वारे हे फोटो जारी करण्यात आले आहेत. छापा टाकल्यानंतर पंचनामा केला जातो. जप्त केलेली वस्तू सील करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावी. तपासणीसाठी पाठवायचे असल्यास जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर ते सील करुन पाठवण्यात यावेत, असे नियम आहेत. हे व्हिडीओ झोनल कार्यालयाचे आहेत हे स्पष्ट होत आहे.

केवळ प्रसिद्धीसाठी हे प्रकरण तयार करण्यात आले आहे. झोनल संचालकांसोबत गोसावीचे काय संबध आहेत याचा खुलासा एनसीबीने करायला हवा. जर एनसीबी हे अधिकारी त्यांचे नाहीत, असे म्हणत असतील तर ते कसे काय दोघांना घेऊन जात होते? एनसीबीला अधिकार आहेत का बाहेरच्या लोकांना घेऊन धाड टाकता येते, जर असेल तर त्यांनी खुलासा करावा. गेल्या एका वर्षापासून महाराष्ट्र सरकार, मुंबईच्या बॉलीवूडला बदनाम करण्यासाठी भाजप बनावट प्रकरणे तयार करत आहेत, तसेच तीन तारखेचे प्रकरण पूर्णपणे खोट असल्याचे मलिक म्हणाले.