अखेर योगी सरकारची राहुल-प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी


लखनौ – उत्तर प्रदेशातील योगी सरकारने वाढत्या दबावापुढे एक पाऊल मागे घेत राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. लखीमपूरला भेट देण्याची काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही परवानगी देण्यात आली आहे. लखनौला जाण्यासाठी काही वेळापूर्वी राहुल गांधींनी दिल्ली विमानतळ सोडले आहे. राहुल यांच्यासोबत पंजाब आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही जात आहेत. लखीमपूर खेरीच्या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे तिन्ही नेते भेट घेतील. उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाने सांगितले की, राज्य सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर तीन जणांना लखीमपूर खेरीला भेट देण्याची परवानगी दिली आहे.

गृह राज्यमंत्री अजय मिश्रा लखीमपूर घटनेवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळादरम्यान आज दिल्लीला पोहोचले. अजय मिश्रा नॉर्थ ब्लॉकमधील आपल्या कार्यालयातून गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या घरी भेटले. गृहमंत्र्यांशी चर्चा केली. लखीमपूरच्या घटनेनंतर ते प्रथमच दिल्लीत आले आहेत.

लखीमपूर खेरी हिंसाचाराला तीन दिवस उलटले असले तरी हिंसाचाराला जबाबदार कोण हा प्रश्न अद्यापही कायम आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा लखीमपूर घटनेनंतर चौकशीच्या फेऱ्यात आहेत. पण, घटनेच्या वेळी ते तिथे नव्हते, असे दोघेही सांगतात.