एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा; किरीट सोमय्यांनी साधला अजित पवारांवर निशाणा


सातारा – जरंडेश्वर साखर कारखान्यावर आज सकाळी भाजप नेते किरीट सोमय्या दाखल झाले. यावेळी त्यांचे सभासदांनी जंगी स्वागत केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडणार नाही. पण उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या व्यवहाराची पूर्ण चौकशी होईल, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घेतलेल्या भूमिकेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आज किरीट सोमय्या साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी जरंडेश्वर साखर कारखाना परिसराला त्यांनी भेट दिली व परिसराची पाहणी केली. यावेळी कारखान्याच्या सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमय्या यांचे जंगी स्वागत केले. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर दाखल बऱ्याच सभासदांनी कारखाना सभासदांच्या ताब्यात यावा, अशी प्रमुख मागणी किरीट सोमय्या यांच्याकडे केली.

कारखाना चांगला सुरु होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्रही मोठे होते. पण त्यावेळी कारखाना कवडी मोल भावाने कारखान्याचा व्यवहार केला. सामान्य माणसांचा हा कारखाना आहे. सत्तेच्या जोरावर बेकायदेशिररित्या कारखाना ताब्यात घेण्यात आलाय. पुन्हा जरंडेश्वर कारखाना सभासदांचा व्हावा. तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही काही करा, कसेही करा आम्हाला कारखाना पुन्हा मिळवून द्या, अशी मागणी सोमय्यांकडे जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शेतकरी सभासदांनी यावेळी जरंडेश्वर साखर कारखान्यावर किरीट सोमय्या आल्यानंतर घेराव घातला.

कारखाना परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व काही शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंमत असेल, तर कारखान्याचे मालक कोण हे जाहीर करावे. एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा त्यांनी दाखल करावा, असे आव्हान सोमय्या यांनी दिले. कोणताही कारखाना अडचणीत येऊ शकतो. त्याला सरकारने मदत करायला पाहिजे. पण अनेक बेनामी कंपन्यांमधून संशयास्पद व्यवहार करून हा कारखाना अजित पवार यांनी कारखाना घेतल्याचा आरोप त्यांनी केला. हा कारखाना माझा असल्याचे त्यांनी जाहीर करावे, त्यांनी असे आव्हानही त्यांनी दिले.

किरीट सोमय्या भाजप कार्यकर्त्यांसोबत आज सकाळी पाऊणे दहा वाजता जरंडेश्वर कारखान्यावर पोहोचले. कारखान्यावर यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. सुरुवातीला जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. कारखाना चुकीच्या पद्धतीने लिलाव केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सोमय्या यांनी त्यांच्या भावना ऐकून घेऊन कारखाना मूळ सभासद यांचा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

दुसऱ्या बाजूला थांबलेले पाच, सहा राष्ट्रवादी कार्यकर्ते व शेतकरी तेथे आले. सोमय्या यांना त्यांनी घेराव घालत कारखाना सुस्थितीत सुरू आहे. आपल्या अशा पवित्र्याने कारखाना बंद पडेल. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार देशोधडीला लागेल. आपण घेतलेली भूमिका फक्त भाजप विरोधकांसाठी आहे. त्यांच्यावरही आरोप करा, त्यांच्याही चौकशा करा. आपण घेतलेली भूमिका सर्वांसाठी असेल, तर चांगली असल्याचे म्हणत जाब विचारला. यामुळे वातावरण तापले.

किरीट सोमय्या यांनी यावेळी कारखाना सुरूच राहिला पाहिजे. शेतकरी व कामगार यांचे हित सुरूच राहिले पाहिजे. आपला लढा केवळ चुकीच्या पद्धतीने लिलाव झाल्या त्याविरुद्ध आहे. कारखाना मूळ सभासदांना मिळाला पाहिजे. याबाबत उच्च न्यायालयाने लिलाव प्रक्रियेच्या तपासाचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कोणी दहशत पसरवू नये व अपप्रचार करू नये असेही ते म्हणाले.