प्रियंका गांधींचे आंदोलन दडपण्यासाठीच केंद्र सरकारने जाणीवपूर्वक बंद केले फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम


नवी दिल्ली – फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा विशिष्ट तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी रात्रीपासून तब्बल सहा तासांसाठी खंडित झाली होती. खरंतर, अनेक तासांसाठी ठप्प झालेल्या सेवेमुळे सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना आणि चर्चांना उधाण आले. हे अ‍ॅप्स नेमके अचानक बंद कसे काय झाले? याबाबत चर्चा होऊ लागल्या, त्याचसोबत अनेक विनोदही केले गेले. पण, आता याला देशात राजकीय वळण मिळताना पाहायला मिळत आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर यासाठी अनेकांनी मोदी सरकारला दोषी ठरवले. फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप प्रियंका गांधींचे आंदोलन दडपण्यासाठीचे बंद करण्यात आल्याच्या मोठ्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. हा दावा अगदी कॉंग्रेसच्या खासदारांपासून ते ‘आप’च्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच केल्याचे पाहायला मिळत आहे.

याबाबतचे एक ट्विट काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी केले आहे. असे दिसत आहे की जणू केंद्र सरकारने फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम जाणीवपूर्वक बंद केले आहे. हे सर्वकाही प्रियंका गांधीजींची चळवळ दडपली जाईल, यासाठी करण्यात आल्याचा दावा उदित राज यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियात भाजप मंत्र्याच्या दुष्कर्माचा व्हिडिओ आल्यापासून फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद झाले आहे. कोणत्याही थराला भाजप जाऊ शकतो, असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याबाबत सोमवारी दिवसभरात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा आरोप केला जात आहे.

याप्रकरणी काँग्रेस नेत्या पंखुरी पाठक म्हणाल्या की, यापूर्वी कधी एवढा वेळ व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक बंद होते का? हे डाऊन झाले आहे की लखीमपूर शेतकरी नरसंहाराचे सत्य दडपण्यासाठी जाणीवपूर्वक केले गेले आहे? कदाचित नवीन व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी? असा सवाल उपस्थित करत पंखुरी पाठक आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणतात की, वायफाय आणि मोबाईल इंटरनेटचा स्पीड देखील कमी करण्यात आला आहे. अनेक लोक जिओ वापरतात, तेही बंद करण्यात आले आहे. टीव्हीनंतर आता या लोकांना इंटरनेटवरील बातम्या आणि माहितीवर देखील पूर्ण नियंत्रण हवे आहे. हे खूप धोकादायक आहे. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम एवढ्या तासांसाठी बंद असणे हा योगायोग आहे की प्रयोग? असे कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता म्हणाले आहेत.