लखीमपूरला जाण्याची ओवेसी यांची घोषणा !


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे काल (रविवार) शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारानंतर देशपातळीवरील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी देखील झाले आहेत. शिवाय, बरीच वाहने पेटवण्यात आल्यामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान देखील झाले आहे.

तसेच, विरोधकांनी आता या घटनेवरून मोदी सरकार व योगी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने हत्या केलेल्यांच्या प्रति एकजुट दर्शवण्यासाठी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे मी जाणार आहे. हा घोर अपराध असून आता वेळ आली आहे की, मोदी सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि त्यांनी या मंत्र्यास देखील हटवले पाहिजे, असे एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

तर, राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. या घटनेवरून भाजप सरकारला समाजवादी पक्ष, राजदसह अन्य पक्षांनीही लक्ष्य केले आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत गाझिपूरहून लखीमपूर खेरीकडे गेले.