लखीमपूर हिंसाचार: संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला विचारले काही प्रश्न


मुंबई – रविवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. आज जे काही उत्तर प्रदेशमध्ये सुरु आहे त्याविरोधात कोणी काही बोलणार आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित करत सध्या शेतकऱ्यांविरोधात सुरु असणारी क्रूर वागणूक हे भाजपचे अधिकृत धोरण आहे का?, असा सवाल राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. त्याचबरोबर मोदी सरकारची तुलना राऊत यांनी ब्रिटीश राजवटीशी करताना क्रांतीकारक बाबू गेनू यांचाही उल्लेख केला आहे.

आपल्या भाषणात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांबद्दल तर फार बोलत असतात, असे सांगत जो प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, ही क्रूर वागणूक आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना का दिली जात आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी देशद्रोही वाटले म्हणून अशी क्रूर कारवाई केली का?, असा प्रश्नही राऊतांनी विचारला आहे.

देशभरातील शेतकऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संतापाची लाट असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. तसेच घटनास्थळी विरोधी पक्षातील नेत्यांना जाण्यास बंदी घालण्यात आल्यावरुनही राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तिथे विरोधी पक्षाला जायला बंदी घातली आहे, ही कोणती लोकशाही असल्याचा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. समाजवादी पक्ष, राजदसह अन्य पक्षांनीही या घटनेवरून भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी गाझीपूरहून लखीमपूर खेरीकडे गेले.

आज, सोमवारी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली. या घटनेची उत्तर प्रदेश प्रशासनाकडून नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. काँग्रेसनेही या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.