लखीमपूर हिंसाचार; अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


लखनऊ – लखीमपूर खेरीच्या घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील आंदोलनांनी वेग पकडला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी लखीमपूर खेरीच्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधींना ताब्यात घेतले. दुसरीकडे, या शेतकऱ्यांची समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांना पोलिसांनी स्थानबद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस बंदोबस्त अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवण्यात आला आहे. अखिलेश यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी घराबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे.

लखनऊमध्ये त्यांच्या घराजवळ सपा प्रमुख अखिलेश यादव आंदोलनासाठी बसले होते. हजरतगंज पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे. लखीमपूर खेरीला अखिलेश यादव जात असताना त्यांना उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशावर पोलिसांनी रोखले, असा दावा पक्षाने केला. त्यानंतर शेकडो सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

पोलिसांच्या वाहनाला अखिलेश यादव यांच्या निवासस्थानाबाहेर आग लावण्याची घटना घडली आहे. ही घटना घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर घडली, जिथे अखिलेश यादव त्याच्या निवासस्थानाजवळ आंदोलनासाठी बसले होते. एका व्हिडिओमध्ये, पोलिस आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. हे कोणी केले माहित नाही. आम्ही आत गेलो, तेव्हा कोणीतरी हे केले, असे एका पोलिसाने म्हटले आहे.

शेतकर्‍यांवर ज्या प्रकारचे अत्याचार हे सरकार करत आहे, तसे अत्याचार इंग्रजांनी सुद्धा केले नाहीत. गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी राजीनामा द्यावा. मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दोन कोटी रुपये आणि सरकारी नोकऱ्या दिल्या पाहिजेत, असे सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.