“माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी” या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद


मुंबई – जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. आज (४ ऑक्टोबर) मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत संवाद साधला आहे.

यावेळी आपल्या लहानपणीच्या आठवणी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या. अनेक महिन्यानंतर शाळेची घंटा ऐकायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरु आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय खुप अवघड होता. शाळेचे नाही तर आपल्या भविष्याचे दार उघडले आहे, हे उघडताना खुप काळजीपुर्वक निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यानी शिक्षकांना आणि वडिलांना आपल्या मुलांची जबाबदारी घेण्याची विनंती केली.