राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल, आशिष शेलारांचे खळबळजनक वक्तव्य


पुणे – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे चित्र कायम पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका केली जात असतानाच एक मोठे वक्तव्य भाजपकडून करण्यात आले आहे. आज पुण्याच्या मावळ दौऱ्यावर भाजप आमदार आशिष शेलार आहेत. त्यांनी हे वक्तव्य भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत असताना केल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. आशिष शेलार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. राज्यातील सत्ताधारी तीन पक्षांत ज्या पद्धतीने आपापसात विसंवादाची रोज लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातील दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असा काढता येऊ शकतो की राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल, असे ते म्हणाले. जेव्हा अशा परिस्थितीत निवडणूक लागेल, तेव्हा मावळमधील आमदार भाजपचाच असला पाहिजे, असे जाहीर आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाच अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. जो मैं बोलता हूं वही करता हूं और जो मैं नहीं बोलता, वो डेफिनेटली करता हूं. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी हे लक्षात ठेवावे, असे आशिष शेलार यावेळी म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असे होईल, असे देखील आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. मावळमध्ये झालेल्या गोळीबारात तीन शेतकरी मारले गेले. १८५ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे काम फडणवीस सरकार केले आहे. गोळ्या ज्याने झाडल्या त्याला आज मुंबईमध्ये प्राईम पोस्टिंग दिली आहे. मावळ मधील शेतकऱ्यांचे खरे शत्रू कोण हे आज पुन्हा एकदा सांगायचे असल्याचे म्हणत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवरून देखील टीकास्त्र सोडले आहे. पुण्यातील एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्याला स्वत:चे भविष्य अंधकारमय दिसले. त्याच्या आत्महत्येनंतर ६ जुलैला विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की ३१ जुलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरू. पण त्यांनी जागा भरण्याच्या प्रस्तावाचा जीआरच ३१ जुलैला काढला. ३० सप्टेंबरपर्यंत ते आश्वासन पूर्ण करू असे म्हणाले असल्याचे आशिष शेलार यावेळी म्हणाले.