परमबीर सिंह यांच्या ठावठिकाण्यावरून नाना पटोलेंनी केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया


नागपूर – सध्या राज्यभरात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पार्श्वभूमीवर भाजपवर गंभीर आरोप केला आहे. केंद्राने परमबीर सिंह यांना देशाबाहेर जाण्यासाठी मदत केल्याची भूमिका नाना पटोलेंनी मांडल्यानंतर त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

नाना पटोले काहीही बोलत असतात, आपल्याला त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर देता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संकट आणि राज्य सरकारची मदत याविषयी देखील भूमिका मांडली आहे. दरम्यान नाना पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. नाना पटोले काहीही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर देता येणार नाही. नाना पटोले असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीत देखील बोलू शकतात, असे फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने मराठवाड्यात अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर घेतलेल्या भूमिकेवर देखील फडणवीसांनी ताशेरे ओढले. सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झालेली नाही. एवढ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये केलेल्या घोषणा कागदावर राहिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत हे वास्तव असल्याचे फडणवीस म्हणाले.

तिथे मंत्री किंवा राज्यातील प्रमुख लोक गेले, तर प्रशासन देखील जागे होत असते आणि लोकांना काहीतरी दिलासा मिळत असतो. कुणीतरी अशा परिस्थितीत आपले ऐकत असल्याचे लोकांना वाटत असते आणि ते महत्त्वाचे असते. उद्यापासून आम्ही देखील मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहोत. सरकारपर्यंत तेथील परिस्थिती पोहोचवून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे देखील फडणवीस म्हणाले. पहिल्यांदा नजर आणेवारीच्या आधारावरच मदत करता येते. वैयक्तिक पंचनाम्याची आवश्यकता पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण आधी तातडीची मदत काय करता येईल, याचा सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे फडणवीसांनी नमूद केले.