केंद्राने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर कळवावे : अजित पवार


पुणे : येत्या 4 तारखेपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे, पण आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही. पालक मुलांना दिवाळीनंतर शाळेत पाठवण्यास तयार आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारने लहान मुलांच्या लसीबाबत निर्णय घेणे उचित नाही. केंद्राच्या पातळीवर जोपर्यत निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर कळवावे, असे राज्याचे उपमुख्ममंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यामधील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही माहिती दिली.

पुणे शहरात कोरोना रुग्णवाढीचा दर हा सध्या 2.1 टक्के एवढा आहे. लसीकरणामध्ये या आठवड्यात 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरा डोस घेतो, तो व्यक्ती कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत असल्याचे सांगत नागरिकांनी मास्कचा वापर करावा, काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे. पण त्या ठिकाणी काही तालुके पूर्ण बाधित झाले आहेत, तर काही ठिकाणी पूर्ण तालुके बाधित झाले नाहीत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत, विमा कंपन्याना देखील सूचना दिल्या आहेत. मराठवाड्यात खूप नुकसान झाले आहे. आपण त्याची माहीत घेत आहोत. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधी आम्ही सकारात्मक आहोत.

अजित पवार पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवारमुळे मराठवाड्यातील ही पूरस्थिती झाली, असे काही तज्ञ म्हणतात. हे तपासून घ्यावे लागेल. कॅगने या आधीच या योजनेवर शंका उपस्थितीत केली आहे. आता हा नवीन मुद्दा उपस्थितीत झाला आहे. त्याची आधी चौकशी करु आणि मग पाहू.