68 वर्षांनी पुन्हा एकदा एअर इंडियाची जबाबदारी सांभाळणार टाटा सन्स


नवी दिल्ली – तब्बल 68 वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटा सन्सकडे एअर इंडियाची मालकी जाणार आहे. यासंदर्भात ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियासाठी टाटा सन्सकडून लावण्यात आलेली बोली मंत्री गटाने मान्य केली आहे. पण याबाबत अद्याप टाटा सन्स किंवा एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

टाटा सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडिया खरेदी करणार आहेत. यासंदर्भात ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपची एअर इंडियासाठी पॅनलने निवड केली आहे. टाटा ग्रुप आणि स्पाइसजेटच्या अजय सिंह यांनी एअर इंडियासाठी बोली लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच सरकार अधिकृतपणे याची घोषणा करु शकते.

दरम्यान, 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना जेआरडी टाटा यांनी केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून 29 जुलै 1946 रोजी त्याचे नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आले होते. एअर इंडियातील 49 टक्के भागीदारी स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये भारत सरकारने घेतली होती. 1953 मध्ये याचे पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते.

संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना सरकारने सांगितले होते की, आर्थिक वर्ष 2019-20च्या प्रोविजनलच्या आकड्यांनुसार, एअर इंडियावर एकूण 38,366.39 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एअर इंडिया एसेट्स होल्डिंग लिमिटेडचे स्पेशल पर्पज व्हीकल (SPV) ला एअरलाइन्सद्वारे 22,064 कोटी रुपये ट्रान्सफर केल्यानंतरची ही रक्कम आहे.

इंडियन एअरलाइन्समध्ये 2007 साली विलीन झाल्यानंतर एअर इंडिया कधीच नेट प्रॉफिटमध्ये राहिली नाही. मार्च 2021 मध्ये संपणाऱ्या तिमाहीत एअर इंडियाला सुमारे 10,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 31 मार्च 2019 पर्यंत कंपनीवर एकूण 60,074 कोटींचे कर्ज होते. पण, आता यामधील 23,286.5 कोटी रुपयांच्या कर्जाचा भार टाटा सन्सला उचलावा लागणार आहे.