खड्ड्यात सेल्फी घेणाऱ्या सुप्रियाताई आता कुठे गेल्या? आशिष शेलार यांचा निशाणा


मुंबई – मुंबईकरांसाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईतील खड्डे हा चिंतेचा, मनस्तापाचा आणि राजकीय पक्षांसाठी आरोप-प्रत्यारोपाचा मुद्दा ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. खड्डे बुजवण्यात गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केल्यानंतर महापौरांनी मुंबईतील ४२ हजार खड्डे भरल्याचा दावा केला. यावरून भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका करतानाच थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

खड्डे बुजवण्याच्या कामात हयगय किंवा गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर त्यावर आशिष शेलार यांनी तोंडसुख घेतले आहे. कंत्राटदारावर कारवाई करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी फेकलेले वाक्य भाषणातील वाक्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांनी जर राज्यभरातील ज्या विविध एजन्सींच्या अखत्यारीत खड्ड्यांचे काम आहे, त्यांची बैठक घेतली असती, तर आम्हाला पटले असते. कंत्राटदारांवर कारवाई केली असती, तरी आम्हाला पटले असते, असे आशिष शेलार म्हणाले.

पण, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका करतानाच सुप्रिया सुळेंवर देखील निशाणा साधला. सुप्रिया सुळेंनी केलेल्या सेल्फी विथ खड्डे आंदोलनासारखे मुख्यमंत्र्यांचं वाक्य आहे. हे दिखाऊपणाचे असल्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. सुप्रियाताई आता कुठे गेल्या? सेल्फी विथ खड्डे हा कार्यक्रम कुठल्या भाषणात गेला? त्यांनीही भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती आहे, अशी खोचक प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.