पंजाबनंतर छत्तीसगडमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा सुरू; आमदारांची दिल्ली वारी!


रायपूर – पंजाबमध्ये मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेला राजकीय कलह अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्रीपदाचा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर नवजोतसिंग सिद्धू आणि मंत्री रझिया सुलताना यांनी देखील राजीनामा दिला आहे. पण, आता पंजाबपाठोपाठ छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसला ग्रहण लागणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि त्याला राज्यातील १२ ते १५ आमदारांची दिल्ली वारी कारणीभूत ठरली आहे. अचानक एकत्र हे सर्व आमदार दिल्लीत कसे गेले? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले असून सिंग देव यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

बुधवारी थेट राजधानी दिल्लीत छत्तीसगडमधील किमान १२ ते १५ आमदार हायकमांडची भेट घेण्यासाठी पोहोचले. एकीकडे हे आमदार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी दिल्लीत गेल्याचे सांगितले जात असताना या आमदारांनी मात्र वेगळेच कारण सांगितले आहे. या आमदारांनी दिल्लीत पोहोचताच आम्ही राहुल गांधी यांच्या प्रस्तावित छत्तीसगड दौऱ्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमके काय कारण असू शकते, याचे अंदाज बांधले जात आहेत.

मध्यंतरी छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे मतभेद टोकाला गेल्याचे समोर आले होते. टी. एस. सिंह देव याच्यामते २०१८मध्ये राज्यात भाजपला पराभूत करून काँग्रेसचे सरकार आले, तेव्हा अडीच वर्ष भूपेश बघेल मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर सिंह देव यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाईल, असे ठरले होते. या वर्षी जानेवारी महिन्यात बघेल यांच्या मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष देखील पूर्ण झाली आहेत.

पण, छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी त्याच वेळी असे काहीही ठरले नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यापाठोपाठ भूपेश बघेल आणि टी. एस. सिंह देव यांनी दिल्लीत हायकमांडची भेट देखील घेतली होती. राज्यात परतल्यानंतर भूपेश बघेल हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. राज्यातील काँग्रेसच्या ७० आमदारांपैकी किमान ५४ आमदारांनी या काळात बघेल यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दिल्ली गाठली होती.