ठाकरे सरकारचा पुरामुळे सीईटी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय


मुंबई – मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन सामंत यांनी केले.

उदय सामंत म्हणाले, कालपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नद्यांना पूर आला आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे, रस्त्यांवर पाणी आले आहे, संपर्क तुटला आहे. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आल्या नाहीत. हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. त्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना मला सांगायचे आहे की त्यांना काळजी करण्याचे कारण नाही.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच आदेश दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची सीईटीच्या लिंकवर नोंदणी झाली आहे, त्या सर्वांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. त्यामुळे पुरामुळे ज्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, त्यांची तारीख आज किंवा उद्या जाहीर करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.