शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचे समन्स


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना येत्या सोमवारी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २७ सप्टेंबरच्या रात्री भावना गवळी यांचे निकटवर्तीय आणि सहकारी सईद खान यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तर, आज भावना गवळी यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. शिवसेनेसाठी आता हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना ईडीकडून नुकतीच अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली. पण ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा खान यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी केला आहे. दरम्यान, सईद खान यांच्या अटकेनंतर भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाल्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांना ईडीकडून चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाशीम जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या भावना गवळी यांच्या संस्थांमध्ये ईडीने ३० ऑगस्ट रोजी देखील झडती घेतली होती. गवळींवर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर, गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधी आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी दोन व्यक्तींना ईडीने समन्स पाठवले होते. पण खासगी कारण देत या दोन्ही व्यक्तींनी आपल्याला ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी ६ सप्टेंबर रोजी केली होती.