मुख्यमंत्र्यांचे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना धीर न सोडण्याचे आवाहन


मुबई – मराठवाड्यामधील शेतकऱ्यांचे सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागामध्ये तुफान पाऊस गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून झाल्यानंतर शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले. त्यामुळे आता पुढे काय? असा यक्षप्रश्न समोर उभा ठाकलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा देणारे आवाहन केले आहे.

या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.

बाधित शेतकरी, नागरिक यांना कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे. तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे, असेही त्यांनी आज सांगितले.

काल सायंकाळी आणि आज सकाळी देखील मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातील जिल्हे प्रभावित झाले आहेत.

बचाव व तातडीच्या मदत कार्यास सध्या वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. काही ठिकाणी सततच्या पावसामुळे फळबागांचेही नुकसान झाले आहे, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

अनेक विद्यार्थी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचवा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.