१९ ऑक्टोबरला होणार २० वी ऊस परिषद – राजू शेट्टी


कोल्हापूर – १९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. तसच यावेळी त्यांनी जागर एफआरपीचा, आराधना शक्तीस्थळांची या आंदोलनाची घोषणा देखील केली आहे. नवरात्रीपासून एफआरपीचे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. आंदोलनाला जोतिबाच्या डोंगरावरून सुरुवात होईल, अशी माहिती यावेळी त्यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच दसऱ्याला जेजुरी येथे मेळावा घेऊन आंदोलनाची सांगता होईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

साखर कारखानदार यांच्या मनात शेतकऱ्यांना चार पैसे देण्याचे नसल्यामुळे निती आयोगाला हाताला धरून एफआरपीचे तुकडे पाडण्याचे काम सुरू केले आहे. भाजपने एफआरपीचे तुकडे करण्याचे काम केले आणि तेच पुण्यात आंदोलन करत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

ऊस तुटल्यावर १४ दिवसात ६० टक्के एफआरपी त्यानंतर पुढच्या १४ दिवसात २० टक्के एफआरपी आणि त्यानंतर दोन महिन्यात २० टक्के एफआरपी द्यावी अशी शिफारस केली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. जर आमचा दसरा कडवट झाला, तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला.

घटस्थापनेपासून जोतिबाचे दर्शन घेऊन ऊसाच्या एफआरपीसाठी आंदोलनाला सुरुवात केली जाईल. जोतिबा, अंबाबाई, बाळू मामा यांचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात होणार. १९ ऑक्टोबर रोजी २० वी ऊस परिषद होणार असून कुणाची परवानगी मागणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.