काँग्रेसमध्ये कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांना प्रवेश देण्यावरुन मतमतांतरे?


नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी हे दोघे प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण या दोघांच्या पक्ष प्रवेशावरुन आता काँग्रेसमध्येच मतमतांतरे असल्याचे समोर येत आहे. पक्षाने या दोघांना संधी दिल्यास बिहार आणि गुजरातमध्ये काँग्रेसचे दिवस पालटतील, असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे, तर दुसरीकडे पक्षाचे या दोघांच्या प्रवेशामुळे फारसे भले होणार नसल्याचे काही नेत्यांना वाटत आहे. अशातच या पक्ष प्रवेशावरुन काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी टोला लगावला आहे. ‘कम्युनिस्ट्स इन कांग्रेस’ या पुस्तकाची आठवण करुन देत त्यांनी एक ट्विट केले असून आपल्याच पक्षाला त्यांनी घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे.

ट्विटरवरुन लोकसभेचे खासदार असणाऱ्या तिवारी यांनी काँग्रेसमध्ये काही कम्युनिस्ट नेत्यांचा प्रवेश होणार असल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. आता कदाचित १९७३ च्या ‘कम्युनिस्ट्स इन कांग्रेस’ या पुस्तकाची पाने पुन्हा चाळायला हवीत. असे वाटत आहे की गोष्टी जितक्या जास्त बदलतात तितक्याच त्या आधीप्रमाणे होत राहतात. आज पुन्हा हे पुस्तक वाचतो, असे म्हटले आहे. गांधी कुटुंबियांच्या निकटवर्तीयांपैकी एक तिवारी हे समजले जात असल्यामुळे या ट्विटमुळे पुन्हा एकदा कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्या पक्षप्रवेशावरुन पक्षात मदतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसने उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून मेवानीविरोधात उमेदवार न देता मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने या नेत्याला अप्रत्यक्षपणे मदत केली होती. मेवानी यांना आता थेट पक्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांना सोबत घेऊन काँग्रेस आपली नवीन राजकीय खेळी सुरू करणार आहे. हे दोघेही २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा असा विश्वास आहे की कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळू शकते. गेल्या तीन दशकांपासून बिहारमध्ये काँग्रेस काही खास कामगिरी करु शकलेली नाही. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही, मित्रपक्ष आरजेडी आणि सीपीआय (एमएल) च्या तुलनेत काँग्रेसने फारच सुमार कामगिरी केली होती. काँग्रेसने लढवलेल्या ७० पैकी केवळ १९ जागांवर त्यांना विजय मिळवता आला होता. आरजेडीने १४४ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या, तर सीपीआय (एमएल) ने १९ पैकी १२ जागा जिंकल्या जिथे त्यांनी उमेदवार उभे केले होते. त्यामुळेच कन्हैयामुळे काँग्रेसला बिहारमध्ये ‘अच्छे दिन’ येतील असा विश्वास काही नेत्यांना वाटत आहे.

कुमार आणि मेवानी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला नव्या दृष्टीने चालना मिळेल. पक्षाकडे गेल्या दोन वर्षांपासून अनेक तरुण नेत्यांनी पाठ फिरवल्याचं पहायला मिळाले आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाला तरुण नेतृत्वाची अधिक भासू लागली आहे. या दोघांच्या माध्यमातून ती गरज भरुन निघेल, अशी काही नेत्यांना अपेक्षा आहे.

कन्हैयाकडून अशा स्थितीत पक्षाला काय फायदा होणार, असाही प्रश्नही काही काँग्रेस नेते विचारत आहेत. सीपीआय नेतृत्वावर कन्हैयाचा राग आहे. अशा परिस्थितीत जर त्याला काँग्रेसचे व्यासपीठ मिळाले तर त्यांचा राजकीय वजन वाढेल. पण पक्षाला काय फायदा होईल, काँग्रेसने या नफा -तोट्याचे आकलन केले पाहिजे, असे काहींचे म्हणणे आहे.