बिनविरोध होणार राज्यसभेची पोटनिवडणूक! भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांची माघार


मुंबई – राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी राजीव सातव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत असून काँग्रेसकडून त्यासाठी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, या निवडणुकीसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. पण, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. ही पोटनिवडणूक काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे अभिनंदन केले.

उमेदवारी अर्ज रजनी पाटील यांनी दाखल केल्यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देत म्हटले होते की, आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवी घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. दरम्यान, परंपरा कायम राखत अर्ज माघारी घेण्याचा निर्णय भाजपने घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.