माथाडी कामगारांचे श्रद्धास्थान अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन


मुंबई :- माथाडी कामगारांचे दैवत, माथाडी चळवळीचे संस्थापक, माथाडी कामगार कायद्याचे जनक दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

दिवंगत अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांना संघटीत, सक्षम करुन राज्यात खूप मोठी ताकद निर्माण केली. माथाडी बांधवांची संघटीत ताकद कायम ठेवून दिवंगत अण्णासाहेबांना अपेक्षित मार्गाने माथाडी चळवळ पुढे नेणे, माथाडींच्या हक्काची लढाई लढत राहणे, माथाडींना न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या जीवनात सुधारणा घडवणे, हीच दिवंगत अण्णासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत अण्णासाहेबांचे स्मरण करुन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दिवंगत अण्णासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अण्णासाहेबांनी या राज्यातल्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कांची लढाई लढली. कष्टकरी माथाडी बांधवांना संघटीत करुन त्यांच्या श्रमाला मोल, सन्मान मिळवून दिला. अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या तसेच माथाडींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांना बळ देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. माथाडी कामगारांच्या घरांचा, आरोग्याचा, मुलांच्या शिक्षणाचा, मुलांच्या नोकरीचा प्रश्न सोडवून माथाडी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत.

बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी शंभर कोटींची अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. आवश्यकतेनुसार अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दिवंगत अण्णासाहेबांचा लढा कष्टकरी माथाडी बांधवांसाठी, कामगार वर्गाच्या हक्कासाठी होता. त्यांचा लढा, त्यांचे विचार, कार्य पुढे घेऊन जाणे, माथाडी बांधवांची चळवळ भक्कम करणे, दिवंगत अण्णासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र घडवणे हीच अण्णासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.