परत कोणी महिलेला स्पर्श करण्याचा आणि त्रास देण्याचा, वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे – पंकजा मुंडे


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असल्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील साकीनाकामध्ये झालेल्या घटनेनंतर डोंबिवली, सातारा, कल्याण येथूनही लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संताप व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखती दरम्यान केली आहे.

महिलांना आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत पूज्यनीय स्थान देण्यात आले आहे. मी माझ्या पहिल्या भाषणापासून महिला अत्याचारावर भाष्य करत आहे. महिला अत्याचारामधील घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढावे, त्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, तर त्यांना देहदंडाची शिक्षा करावी, अशी मागणी आम्ही लावून धरली होती. पण आजचे जे चित्र आहे, ते विदारक दिसत असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

या घटना घडल्यानंतर संताप व्यक्त केला जातो, पण यावेळी खरे काम पोलिसांचे आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले असून पोलिसांच्या यंत्रणा तात्काळ राबवल्या पाहिजेत, जेणेकरुन आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणी महिलेला स्पर्श करण्याचा आणि त्रास देण्याचा, वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे, असेही यावेळी त्यांनी म्हटले.

पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावर ट्वीट करताना चुकीच्या लोकांच्या हातात ताकद असल्याचा उल्लेख केला होता. यासंबंधी बोलताना त्यांनी म्हटले की, आपण जेव्हा राजकारणात पराक्रमी या शब्दाशी जोडले जातो आणि तो जेव्हा हात बांधतो तेव्हा व्यवस्था कोलमडते. म्हणजे चुकीच्या घटना घडल्यामुळे व्यवस्था कोलमडत नाही, तर चुकीच्या घटनांवर आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो, त्यामुळे ती कोलमडते. त्यामुळे मला आत्ताचे राजकारण सभ्य म्हणायला नकोसे वाटते. राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नाही. त्यात आपण राजकीय संस्कृतीचे ट्रेंड जे निर्माण होत आहेत, ते भविष्यासाठी फारसे चांगले नाहीत, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटले.