संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्याला प्रत्युत्तर


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या सव्वा रुपयांची चर्चा सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर संजय राऊतांनी अब्रू नुकसानीच्या दाव्याची किंमत वाढवावी असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. अशातच संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना स्वाभिमान आणि सन्मानाला किंमत नसते, मग तो एक हजार कोटींचा असो किंवा सव्वा रुपयांचा. प्रश्न स्वाभिमानाचा असल्यामुळे किंमत वाढवून घ्या, या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला काहीच अर्थ नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. यासोबतच माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, येथे मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे. अब्रूची आणि स्वाभिमानाची काही किंमत नसते. मग 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोका, 1000 कोटींचा किंवा 1 रुपयांचा दावा ठोका. आम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे खूप पैसा आहे. आम्हाला त्यांच्या पैशांची गरज नाही. आमचे घर त्यांच्या पैशांवर चालत नाही. आम्ही सामान्य लोक आहोत. आमचे कुटुंब स्वतः कमावून पोट भरते, ते त्यांनाही माहीत आहे. प्रत्येकवेळी पैशांचा मुद्दा नसतो, त्यांना प्रत्येक ठिकाणी पैसे दिसतात. त्यांचा पक्ष पेसैवाल्यांचा आहे.