स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नव्या प्रभाग रचनेच्या निर्णयावर राज ठाकरेंची टीका


नाशिक – राज्य सरकारने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवी प्रभाग रचना जाहीर केली असून त्यानुसार तीन, दोन आणि एकसदस्यीय व्यवस्था असेल अशी घोषणा करण्यात आली आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून त्यावर आक्षेप घेतला जात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर तोंडसुख घेतले आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर राज ठाकरे असून तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नव्या प्रभाग रचनेवर टीका केली. देशात कुठेही अशी कोणतीही पद्धत अस्तित्वात नसताना महाराष्ट्रात हे कुठून आणि का सुरू झाले, याचे एकमेव कारण सत्ता काबीज करणे असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

५ वर्षांपूर्वीही या विषयी मी बोललो होतो. जेव्हा २०१२मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार होते, तोपर्यंत एकाच उमेदवाराची व्यवस्था होती. त्यांनी तेव्हा २ उमेदवारांच्या प्रभागाची रचना केली. त्यानंतर भाजपने ४ उमेदवारांचा प्रभाग केला. आता हे सरकार आल्यावर त्यांनी आधी एक प्रभागाची रचना आणली. निवडणूक आयोगानेही एकाच उमेदवाराचा प्रभाग करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काल यांनी पुन्हा ३ उमेदवारांचे प्रभाग आणले, असे राज ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, राज ठाकरेंनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार का? असा उलट सवाल देखील केला. मुळात देशात कुठेही अशी कोणतीही पद्धत नाही. सगळीकडे खासदारकी, आमदारकी, पालिका, ग्रामपंचायतीपर्यंत एकच उमेदवार हीच पद्धत आहे. महाराष्ट्रात हे कुठून सुरू झाले आणि का याचे एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्यातून आपापल्या पद्धतीने प्रभाग तयार करणे आणि पैसा ओतून निवडणूक जिंकणे. पण याचा त्रास लोकांना का? एका उमेदवाराला मत देण्याऐवजी तीन उमेदवारांना लोकांनी का मत द्यायचे? जनतेला गृहीत धरायचे, हव्या त्या पद्धतीने प्रभाग करायचे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी. महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का? हा कसला खेळ चालू आहे? उद्या तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का?” असे ते म्हणाले.

राज्य सरकारवर यासंदर्भात टीका करतानाच राज ठाकरेंनी नागरिकांना देखील आवाहन केले आहे. माझी जनतेला विनंती आहे की लोकांनी न्यायालयात, निवडणूक आयोगाकडे जायला हवे. कोणताही नगरसेवक दुसऱ्याला काम करू देत नाही. एकाने प्रस्ताव टाकला तर दुसरा त्याला विरोध करतो. उद्या लोकांना नगरसेवकाला भेटायचे असेल, तर त्यांनी कोणत्या नगरसेवकाला भेटायचे? निवडणुकीची थट्टा करून ठेवली आहे यांनी आणि जनता त्यावर काही बोलत नाही. आम्ही न्यायालयात गेलो, तर त्याला राजकीय वास येतो, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, वारंवार अशा प्रकारे प्रभागरचना बदलून निवडणुका मॅनेज होत असतात, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. यातून निवडणुका मॅनेज होतात. आधी एकचा प्रभाग पुन्हा चारचा का केला. चारचा होता, तो परत तीनचा का केला? गेल्या १० वर्षांतील हा खेळ सुरू आहे आणि आपण उघड डोळ्यांनी बघत राहायचे?, असे देखील राज ठाकरे म्हणाले.