मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. अनिल परब यांनी या आरोपांविषयी किरीट सोमय्या यांना ७२ तासांत माफी मागण्यास सांगितले होते. पण, ७२ तास उलटल्यानंतरही किरीट सोमय्यांकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच, आपण किरीट सोमय्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती अनिल परब यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. अनिल परब यांचे दापोलीमध्ये अवैध रिसॉर्ट असल्याचा देखील आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
— Anil Parab (@advanilparab) September 21, 2021
नुकतेच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्याआधी देखील त्यांनी अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी अनिल परब यांच्यावर देखील दापोलीमधील रिसॉर्टवरून आरोप केल्यानंतर त्यावर अनिल परब यांनी त्यांना ७२ तासांत माफी मागण्याचा इशारा दिला होता. पण, त्यांनी माफी न मागितल्यामुळे आता अनिल परब यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान या याचिकेमध्ये अनिल परब यांनी १०० कोटींसोबतच किरीट सोमय्यांकडून विनाअट माफीची मागणी केली आहे. तसेच त्यांनी ही माफी दोन वर्तमानपत्रांमध्ये छापून आणावी आणि त्यांच्या ट्वीटर हँडलवर न्यायालय ठरवेल, तेवढा काळ ही माफी ठेवावी, अशी देखील मागणी अनिल परब यांनी केली आहे.