राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब


मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली असून काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अखेर उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान काँग्रेस हायकमांडने रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित केली आहे. महाराष्ट्रातील एका जागेचा या सहा जागांमध्ये समावेश आहे. काँग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

काँग्रेस पक्षाकडून राजीव सातव यांच्या जागेवर कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस हायकमांडने रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेसकडून तसे पत्रकच प्रसिद्ध करण्यात आले आहे.

काँग्रेसकडून याआधी मुकूल वासनिक, प्रज्ञा सातव, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा होती. पण अखेरीस रजनी पाटील यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांच्या नावाचा समावेश असल्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

तर, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची नेमणूक करण्यात आली आहे. पण, आता राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे त्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भातही चर्चा झाली. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर उमेदवारी न देता कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी. त्यामुळे आता रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे प्रज्ञा सातव यांची आमदारकी निश्चित मानली जात आहे.