प्रताप सरनाईकांनी रद्द केल्या मंत्री एकनाथ शिदें यांनी केलेल्या नियुक्त्या


ठाणे – पुढील वर्षी महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली असताना शिवसेनेतील पद नियुक्त्यांवरून सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकलेले आमदार प्रताप सरनाईक व मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंघटक यांच्यातील मतभेद सरनाईक यांच्या व्हायरल पत्रप्रपंचमुळे चव्हाट्यावर आले आहेत. सरनाईक यांनी जिल्हा संपर्कप्रमुख नात्याने पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलेली पदे रद्दबातल ठरवली आहेत. तर जिल्हाप्रमुख व जिल्हासंघटक यांनी संदेश जारी करत शिंदेंच्या आदेशाचा उल्लेख करून त्या नियुक्त्या ग्राह्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीचे नाईक आत्महत्या प्रकरण लावून धरत अभिनेत्री कंगना राणावतच्या आरोपांना प्रत्युत्तर देणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व कुटुंबियांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्या पासून सरनाईक हे अडचणीत आले आहेत. सध्या सर्वसामान्य शिवसैनिक, नागरिक तर सोडाच सेनेचे पदाधिकारी, पत्रकारांना पण त्यांच्याशी थेट संपर्क साधता येत नाही. थेट शिवसेनापक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आमदार प्रताप सरनाईक व त्यांचे कुटुंबियांची जवळीक मानली जाते. तर सेनेतील महत्वाचे नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यातील कलगीसुद्धा सतत चर्चेत असतो.

सरनाईक हे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले असून मीरा भाईंदर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. परंतु भाजपने महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवली, पण सरनाईकांना मात्र शिवसेनेला सत्तेच्या जवळदेखील नेता आले नाही. महानगरपालिका व संघटनेत सरनाईक यांनी स्वतःचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करणे स्वाभाविक असले तरी यातूनच गटबाजी सुद्धा वाढत चालली आहे. सरनाईक सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकलेले असतानाच दुसरीकडे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे व जिल्हासंघटक स्नेहल सावंत यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनेकांना शिवसेनेची पदे नियुक्तीची पत्र वाटप केली आहेत.

महिला उपजिल्हा संघटक पदी विद्या कदम, जयलक्ष्मी सावंत, प्राची पाटील यांची नियुक्ती केली गेली आहे. तसेच उपशहर संघटक, विभाग प्रमुख आदी अन्य पदे सुद्धा देण्यात आली आहेत. या पदांच्या नियुक्तीवरून सरनाईक व त्यांचे समर्थक नाराज आहेत. सरनाईक यांनी तर म्हात्रे व सावंत याना पत्र लिहून त्याच्या प्रति पक्षनेत्यांना पाठवल्या आहेत. त्या पत्रांच्या पोच केलेल्या प्रति ह्या सध्या सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेत असलेले अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

त्या पत्रात सरनाईक यांनी म्हटले आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य वरिष्ठ नेत्यांना न कळवता स्वतःच्या लेटरहेडाचा बेकायदेशीर वापर करून परस्पर नियुक्त्या केल्या असल्यामुळे पक्षात वादविवाद सुरू झाले आहेत. मी त्याची तक्रार वरिष्ठांना केली असून त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. सामनात प्रसिद्ध झालेल्या पदांव्यतिरिक्त सर्व नियुक्त्या बेकायदेशीर आहेत. अश्या नियुक्त्या पक्ष शिस्तीत न बसणाऱ्या बेकायदेशीर असल्यामुळे जिल्हासंपर्क प्रमुख म्हणून त्या नियुक्त्या रद्द करत असल्याचे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

महानगरपालिकेवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे भगवा फडकवण्याचे स्वप्न साकार करायचे असून शिवसेनेत वादविवाद व मतभेद होणार नाहीत, याची काळजी जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख म्हणून आपण घ्यायची असल्याची तंबी देखील म्हात्रे व सावंत यांना दिली आहे. स्नेहल सावंत यांना लिहलेल्या पत्रात एक मुद्दा वेगळा आहे. त्यात काही पदांची यादी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली होती. ती अजून मंजूर झाली नाही व सामनात न आल्यामुळे एकनाथ शिंदे व आपण अत्यंत तातडीची होती म्हणून तात्पुरती पदे वर्षभरासाठी दिली होती, असे सरनाईक यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सरनाईकांनी दिलेले ती तात्पुरती पदे देखील बेकायदेशीर नाही का? मुळात शिवसेनेत पद रद्द करण्याचा अधिकार संपर्कप्रमुखांना आहे का? असा सवाल काही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.

म्हात्रे व सावंत यांच्या नावाने सरनाईक यांच्या लेटरबॉम्बवर शिवसेना जिल्हाशाखेचा संदेश व्हायरल झाला आहे. त्यात जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संघटक यांनी केलेल्या पद नियुक्त्या ह्या ग्राह्य असून पक्षवाढीसाठी तसे अधिकार आहेत, असा मंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शिवसेनेमधील पद नियुक्त्यांचा वाद शिंदे विरुद्ध सरनाईक असा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.