काल दिवसभऱात देशात 30,256 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर 295 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : सलग पाचव्या दिवशी देशात 30 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभऱात 30,256 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच उपचारानंतर 43,938 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रविवारी केरळमध्ये 19,653 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आली आहे. त्यासोबतच कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढून 45 लाख 8 हजार 493 वर पोहोचली आहे. काल कोरोनामुळे 152 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावलेल्यांचा आकडा वाढून 23,591 एवढा झाला आहे. काल दिवसभऱात 26,711 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा 43 लाख 10 हजार 674 एवढा झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार अद्याप कायम आहे. राज्यात काल दिवसभऱात 3,413 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 326 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 36 हजार 887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.16 टक्के आहे. तर राज्यात काल दिवसभरात 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11, 720 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात सध्या 42 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तर दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईत काल दिवसभरात 420 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 523 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,14,947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4629 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1222 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 45 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.