कोणत्याही क्षणी कोसळेल ठाकरे सरकार : नारायण राणे


मुंबई – पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. औरंगाबादेत युतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला आहे. त्याबाबत विचारले असता नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्याबाबत विचारले असता राऊतांनी एकदा तर 25 वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही, अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केली आहे. तसेच मंत्री बनण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत, असे सूचक वक्तव्यही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असेही राणे म्हणाले.