पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस हायकमांडचा राजीनामा देण्याचे आदेश


अमृत्तसर – सध्याच्या घडीला पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढत चालला आहे. आता पक्षाने या सर्व गोंधळात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याचे काँग्रेस हायकमांडने आदेश दिले आहेत. याशिवाय संध्याकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि खासदार मनीष तिवारी यांच्याशी याबाबत माहिती मिळताच अमरिंदर सिंग यांनी चर्चा केली आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी आधी जर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले गेले, तर ते पक्षही सोडतील असेही सांगितले होते.

सध्या पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सर्व प्रयत्न करूनही अमरिंदर सिंग आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी याबाबत सोनिया गांधीकडे भाष्य केले आहे. अशा अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नसल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटल्याचे बोलले जात आहे.

पंजाब काँग्रेस सरकारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर नेतृत्वाच्या बदलाची चर्चा चंदिगढमधील आमदारांच्या बैठकीत तीव्र झाली आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना अमरिंदर सिंग यांनी सांगितले आहे, असा अपमान पुरेसा आहे, हे तिसऱ्यांदा होत आहे. मी अशा अपमानाने पक्षात राहू शकत नाही.

नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या आमदारांच्या एका गटाने गेल्या काही महिन्यांत अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले असून नव्या नेत्याची मागणी केली आहे. सुनील जाखड़, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रताप सिंह बाजवा आणि बेअंत सिंह यांचे नातू आणि खासदार रवनीत सिंह बिट्टू अशी नावे पंजाबच्या संभाव्य नवीन मुख्यमंत्र्यासाठी लढत आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळा दरम्यान शनिवारी राज्याच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस आणि पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी शुक्रवारी रात्री ही घोषणा केली होती. मात्र आता त्याआधीच अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याबाबत माहिती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.