राज्यातील तीन माहिती आयुक्तांची नियुक्ती


मुंबई : महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्त म्हणून डॉ. सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय, आणि राहुल भालचंद्र पांडे या तिघांची नेमणूक करण्याची अधिसूचना काढण्यात आली. या तिघांच्या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मान्यता दिली असून राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना 16 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली.

सुरेशचंद्र गैरोला हे भारतीय वन सेवेचे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त अधिकारी असून भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषदेचे महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. समीर सहाय हे भारतीय वन सेवेतील निवृत्त अधिकारी असून त्यांनी यापूर्वी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे अतिरिक्त निवासी आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तसेच वन खात्यात कार्यरत असताना त्यांनी मराठवाड्यात रोजगार हमी योजना व वन तलावाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले आहे. राहुल भालचंद्र पांडे हे वरिष्ठ पत्रकार असून ते कायद्याचे पदवीधर आहेत. त्यांनी राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीही संपादन केली आहे.