आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यांची नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीका; म्हणाले ते पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत!


अमृतसर – पंजाबच्या राजकारणातील नवज्योत सिंग सिद्धू हे राखी सावंत असल्याची टीका आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार राघव चड्ढा यांनी केली आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतीविषयक कायद्यांबद्दल दिल्ली सरकारच्या भूमिकेवर नवज्योत सिंग सिद्धू यांनी सवाल उपस्थित केला होता. चड्ढा यांनी त्यांना प्रत्युत्तर देतांना टीका केली. आज संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांची वर्षपूर्ती असून त्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.

आपल्या ट्वीटमध्ये नवज्योत सिंद्धू यांनी म्हटले होते की गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिल्ली सरकारने तीन कृषी कायद्यांपैकी एका कायद्याची अंमलबजावणी सुरू केली होती आणि शेतकऱ्यांना बाजारसमित्यांच्या बाहेर शेतमाल विक्रीला परवानगी दिली होती. आता हा आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मागे घेतला का हे सांगावे?असा सवाल केला होता.

चड्ढा यावर उत्तर देताना म्हणाले की, पंजाबच्या राजकारणातील नवज्योत सिद्धू हे राखी सावंत आहेत. तसेच काँग्रेस हायकमांडकडून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात ट्विट केल्याबद्दल पीपीसीसी प्रमुखांना फटकारण्यात आल्यामुळे ते आज अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. उद्यापर्यंत थांबा, कारण ते पुन्हा कॅप्टन यांच्यावर टीका करणे सुरू करतील, असे चड्ढा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, राघव चड्ढा यांच्यावर या ट्विटनंतर चौफेर टीका सुरू झाली आहे. एकेकाळी आपमध्ये असलेल्या आणि आता काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्या अलका लांबा यांनी म्हटले की, आपची महिलांप्रती मानसिकता चड्ढा यांच्या वक्तव्यामुळे दिसून आली आहे. आपची मानसिकता आणि विचारसरणी आरएसएस सारखीच आहे. लांबा यांनी दयनीय राजकारणाचे प्रदर्शन म्हणत चड्ढा यांना “संघी चढ्ढा” म्हटले आहे.