एनसीआरबीच्या अहवालानुसार दिल्ली महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर


नवी दिल्ली – २०२० या वर्षासाठीचा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा (National Crime Record Bureau) हा अहवाल जाहीर झाला असून त्यानुसार, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कोरोनाच्या काळात महिलांविरोधातील नोंद झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण ८.३ टक्क्यांनी घटले आहे. पण असे असले, तरी अन्य महानगरांच्या तुलनेत देशाच्या राजधानी शहरात सर्वाधिक हिंसक आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महिलांसाठी दिल्ली हे सर्वात असुरक्षित शहर आहे.

देशाच्या राजधानीत २०२० मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांची १० हजार ९३ पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मुंबई, पुणे, गाझियाबाद, बेंगळुरू किंवा इंदूरमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या दुपट्टीपेक्षा जास्त आहे. तर २०१८ मध्ये दिल्लीत महिलांविरोधातील गुन्ह्यांची १३ हजार ६४० प्रकरणे नोंदवण्यात आली होती आणि त्या पुढील वर्षी ही संख्या ३०० ने कमी झाली होती. आकडेवारी असेही दर्शवते की बहुतेक प्रकरणांमधील गुन्हेगार हे पीडितांना ओळखत होते.

ऑनलाईन चोरी, फसवणूक आणि लैंगिक छळासह सायबर गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षी वाढ झाली आहे. १६८ पेक्षा जास्त प्रकरणे दिल्लीमध्ये नोंदवण्यात आली आहेत. दरम्यान, इतर महानगरांच्या तुलनेत दिल्लीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

भारतीय दंड संहितेअंतर्गत (IPC) दिल्लीमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या २०१९ ते २०२० या एका वर्षात १८ टक्क्यांनी कमी झाल्याचे एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीत समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षी २.४ लाखांहून अधिक म्हणजेच दिवसाला ६५० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली होती. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये गुन्ह्यांची १९ हजार ९६४ आणि मुंबईत ५० हजार प्रकरणे नोंदवली गेली. तर २०२० मध्ये खुनाचे एकूण ४७२ गुन्हे नोंदविण्यात आले. यामागे प्रेम प्रकरण आणि मालमत्तेचा वाद हे सर्वात सामान्य हेतू होते. तर २०१९ मध्ये खुनाची ५२१ प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये अपहरणाची प्रकरणे ५ हजार ९०० वरून २०२० मध्ये ४ हजार ६२ झाली आहेत. त्यापैकी ३ हजारांपेक्षा जास्त प्रकरणात १२ ते १८ वयोगटातील पीडित होते. पण, आकडेवारीत घसरण होऊनही दिल्लीत अपहरणाचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. दिल्ली पाठोपाठ मुंबईत १ हजार १७३ आणि लखनौमध्ये ७३५ प्रकरणांची नोंद झाली आहे.