अंध, विकलांग व्यक्तींच्या पुनर्वसन कार्यात लक्ष घालण्याचे राज्यपालांचे आश्वासन


मुंबई : दृष्टिहीन विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी लागणारे वाढीव शासकीय अनुदान, कर्णबधीर व बहुविकलांग केंद्राला लागणारे अर्थसहाय्य तसेच कौशल्याधारित शिक्षण घेणाऱ्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू, तसेच विशेष बी.एड. अभ्यासक्रमाला सामान्य बी.एड. अभ्यासक्रमाप्रमाणे समकक्ष मान्यता देण्याबाबतदेखील आपण चर्चा करू असे आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब ) या दृष्टिहीन व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण व रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे आयोजित अंधांसाठीच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.

दृष्टीहीन व विकलांग व्यक्ती अनेक क्षेत्रात चांगली प्रगती करीत आहेत. मात्र तरीही दिव्यांग लोकांचे प्रश्न सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत. सुदैवाने आपल्या देशात अनेक लोक व ‘नॅब’सारख्या संस्था दिव्यांगांसाठी चांगले काम करीत आहेत. असे नमूद करून राज्यपालांनी नॅबला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे डोळे दृष्टीहीनांसाठी उपलब्ध व्हावे
रस्ते अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे डोळे दृष्टीहीन व्यक्तींना विनाविलंब उपलब्ध होण्याबाबत कायद्यात तरतूद करावी अशी मागणी यावेळी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी केली. यावेळी नॅबचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंके, महासचिव गोपी मयूर, सनदी लेखापाल विनोद जाजू, सहसचिव भावेश भाटिया, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री आदी उपस्थित होते.