अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भेटीनंतर रोहित पवारांना दिले आश्वासन


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली आहे. रोहित पवार यांनी मंगळवारी कर्जत आणि जामखेडमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निर्मला सीतारमण यांची भेट घेऊन चर्चा केली. असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक परिणाम झाला. यावेळी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी सिद्ध झाला. याचसोबत, ग्रामीण दैनंदिन मजुरी करणाऱ्या कामगारांचे राहणीमान सुधारले आहे. याच धर्तीवर रोहित पवार यांनी एक मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी निर्मला सीतारमण यांच्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यामुळे, ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली. म्हणूनच, या धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा अशी मागणी केली आहे. सध्या आपल्या मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा निर्माण आणि नुतनीकरणासाठी रोहित पवार हे निधी उपलब्ध करून घेत आहेत.

आर्थिक व्यवहारांसाठी बँकांची रोहित पवार यांच्या मतदारसंघात असलेली संख्या कमी आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागते. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने सावकारकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. या परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे आणि येथील स्थानिक नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना संघटीत बँकिंग व्यवस्थेच्या मदतीने अर्थसहाय्य मिळावे, यासाठी रोहित पवार प्रयत्नशील आहेत. म्हणूनच, रोहित पवार यांनी केंद्राच्या अखत्यारीत असणारा हा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली.

शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन देखील यावेळी निर्मला सीतारमण यांनी दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची देखील आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय वयोश्री योजनेत (RVY) समाविष्ट करण्याबाबत रोहित पवारांनी निवेदन दिले आहे. देशातील दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी भौतिक सहाय्य आणि सहाय्यक-जीवन उपकरणे पुरवण्यासाठीची RVY ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असूनही या योजनेत समाविष्ट नसल्यामुळे याचा समावेश करण्यात यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

तसेच केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची भेट घेऊन USTTAD च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या इतर योजनांची अहमदनगर जिल्हा आणि कर्जत-जामखेडमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी देखील रोहित पवारांनी विनंती केली.