काल दिवसभरात देशात 25,404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 339 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – सलग पाचव्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. देशात 9 सप्टेंबरपासून कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 25,404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 339 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 37,127 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

केरळमधील कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी केरळमध्ये 15,058 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढून 43 लाख 90 हजार 489 झाली आहे. तसेच 99 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केरळात कोरोनामुळे 22,650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 32 लाख 89 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 43 हजार 213 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 84 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 62 हजार 207 रुग्णांना अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात 2740 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 233 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 09 हजार 021 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 05 टक्के आहे. तर काल दिवसभरात राज्यात 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 880 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,102 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.