भाजपचे उद्या राज्यभर महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन


मुंबई – भारतीय जनता पक्षातर्फे उद्या (१५ सप्टेंबर) ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली. तसेच, सर्वोच्च न्यायालयात आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कुटे व टिळेकर भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये देखील उपस्थित होते.

संजय कुटे व योगेश टिळेकर यांनी सांगितले की, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत गेली सहा महिने आघाडी सरकार टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भाजपच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. पण गेल्या सहा महिन्यांत आघाडी सरकारने काही हालचालीच केल्या नाहीत. आघाडी सरकारने इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

याचबरोबर, पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने वकिलच उभा केला नसल्याचे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाहीत, असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भाजपर्फे उद्या १५ सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही कुटे व टिळेकर यांनी नमूद केले.