संजय राठोडांचे राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण


मुंबई – पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण काही महिन्यांपूर्वी चांगलेच तापले होते. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला होता. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भाजपने विधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर असतानाच संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. तर राठोड यांना निर्णय घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनीही दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा देण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

वनमंत्री संजय राठोड बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अडचणीत आले होते. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना राठोड यांनी चौकशीतून सगळे समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचाही आरोपही केला होता. पण भाजप नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना राठोडांचा राजीनामा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर मी एका प्रकरणादरम्यान आता राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचे की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे, पण माझ्या समाजासाठी मी काम करत राहणार असल्याचे माजी मंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. सोलापूर येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये संजय राठोड बोलत होते. स्वतःहून मी राजीनामा दिलेला आहे. जेव्हा आरोप झाले तेव्हा अधिवेशन चालू देणार नाही असे म्हटले गेले. त्या पक्षात मी आहे. नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ काम करणारे म्हणून आहे. मन लावून ते प्रामाणिकपणे एकनिष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे मला वाटले आरोप झाले, जे काही होईल ते पाहू. मी बाजूला राहतो करा तुम्ही चौकशी, असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.