…तर कर्णधारपदावरून होऊ शकते विराट कोहलीची हकालपट्टी


नवी दिल्ली – यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-२० विश्वचषक जिंकण्यात जर भारतीय संघ अपयशी ठरला, तर मर्यादित षटकांचे विराट कोहलीचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते आणि रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे वृत्त समोर आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली यशस्वी झाला आहे, पण संघ त्याच्या नेतृत्वाखाली मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरत आहे.

Cricketaddictor.com मधील एका वृत्तानुसार आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाचे कर्णधार विराट कोहली नेतृत्व करेल. याआधीही तो कर्णधारपदावरून अनेकवेळा चर्चेत आला आहे. विशेषत: एक मजबूत संघ असूनही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आल्यानंतर विराट आपले कर्णधारपद गमवू शकतो.

वेबसाईटने पुढे असे देखील म्हटले आहे की, भारताचा न्यूझीलंडकडून इंग्लंडमधील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात पराभव झाल्यापासून बीसीसीआयचे अधिकारी या विषयावर चर्चा करत आहेत. हे अधिकारी भारतीय कर्णधाराच्या संघ निवडीवर नाखूष होते. या सामन्यात कोहलीने वेगवान गोलंदाजांना अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर दोन फिरकीपटू खेळवले.

अहवालानुसार, कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय खूप चिंतित आहे, विशेषत: तो आयसीसी स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून अपयशी ठरला आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यानंतर जुलैमध्ये बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असे दिसून आले, की बीसीसीआयचे अनेक अधिकारी कोहलीच्या कर्णधारपदावर असमाधानी आहेत.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ या बैठकीला उपस्थित होते. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात दोन फिरकीपटूंसोबत पुढे जाण्याचा निर्णय बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी फारसा आवडला नाही आणि म्हणूनच टी-२० विश्वचषक स्पर्धा कोहलीची शेवटची संधी असू शकते.