ब्रिक्स देशांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात केली मोठी घोषणा


नवी दिल्ली – विकसनशील देशांच्या प्राधान्यक्रमावर ब्रिक्स लक्ष केंद्रित करते, त्यामुळे तो जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज म्हणून उदयास आला असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाच देशांच्या समूहाच्या आभासी शिखर परिषदेत केले. ब्रिक्सने गेल्या दीड दशकात खूप चांगली कामगिरी केली आहे. आपण जगाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी आज एक प्रभावी आवाज आहोत. ब्रिक्स पुढील १५ वर्षांत अधिक उत्पादनक्षम कसे होईल, याबद्दल आपण काम करायला हवे, असेही मोदी म्हणाले. १३ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी आहेत.

ब्रिक्स दहशतवादविरोधी कृती योजना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे जैर बोल्सानारो यांच्या उपस्थितीत शिखर परिषदेने स्वीकारली असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सुरक्षा, प्रादेशिक समस्या, कोरोना, हवामान बदल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा या सर्व मुद्द्यांवर ब्रिक्सची सर्वसमावेशक बैठक पार पडली.

अफगाणिस्तानचा कोणताही संदर्भ पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये दिला नसला, तरी बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी २४ ऑगस्ट रोजी ब्रिक्स राष्ट्रांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचे सादरीकरण केल्यानंतर भारत सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, भारताने सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या गटांना काहींचा पाठिंबा असल्याने देशाच्या शांतता आणि सुरक्षेला धोका आहे. १३ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत बहुपक्षीय प्रणालींना बळकट आणि सुधारित करण्यासाठीही पाच देशांच्या समूहाने भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.