काल दिवसभरात देशात 43,263 कोरोनाबाधितांची नोंद, तर 338 जणांचा मृत्यु


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 43,263 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 338 जणांचा मृत्यु झाला आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात 40,567 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील दररोजच्या कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमधून समोर येत आहे. एकट्या केरळमध्ये बुधवारी 30,196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 181 जणांचा मृत्यू झाला. केरळ मधील कोरोनाबाधितांची ही संख्या देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्क्यांहून अधिक आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 4,174 नवीन कोरोनाबाधितांची रुग्णांची नोंद झाली आहे. तर 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी 4 हजार 155 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 8 हजार 491 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 09 टक्के आहे.

तर काल मुंबईत 349 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,25,247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3895 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1253 दिवसांवर गेला आहे.