जावेद अख्तर प्रकरणी उच्च न्यायालयाचा कंगना राणावतला दणका


मुंबई : उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावतला कोणताही दिलासा देण्यास नकार देत तिची याचिका फेटाळून लावली आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर सुरू केलेली कारवाई ही कायदेशीरदृष्ट्या योग्यच असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान कंगनाने उच्च न्यायालयात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई अयोग्य असल्यामुळे ती रद्द करावी, अशी मागणी केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी 1 सप्टेंबर रोजी राखून ठेवलेला आपला निकाल गुरूवारी जाहीर केला.

जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात कंगनाविरोधात फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. न्यायालयाने या खटल्याची कारवाई सुरू केली आहे. कंगनाने ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली असून दंडाधिकारी न्यायालयाने नियमबाह्य पध्दतीने ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने या याचिकेतून केला होता.

या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे सुनावणी झाली. अख्तर यांच्यावतीने दंडाधिकारी न्यायालयाने याप्रकरणी केलेली कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. तसेच अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचे पूर्ण पालन करण्यात आल्याचा दावा केला आहे. पण निव्वळ पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, न्यायालयाने स्वतंत्र चौकशी केली नसल्याचा बचाव कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला होता.