बुलडाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – डॉ.राजेंद्र शिंगणे


बुलडाणा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच ७ सप्टेंबर रोजी सकाळी मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील नदी काठावरील काही गावे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच त्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या.

काही नागरिकांच्या घरांचीही पडझड आली आहे. त्यामुळे संसार उघड्यावर आले आहेत. अशा बाधित नागरिकांना तातडीने मदत करावी. तसेच काही शेतकऱ्यांच्या जनावरे सुद्धा वीज पडून किंवा पुरात वाहून मृत पावली आहे. बाधित शेतकऱ्यांनाही मदत द्यावी लागणार आहे. तरी यंत्रणांनी पंचनामे पूर्ण करावेत, असे आदेशही पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.