काल दिवसभरात देशात 38 हजार कोरोनाबाधितांची नोंद, तर 369 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर देश उभा असून देशासह अनेक राज्यातही तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत आहे. अशातच देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही उतार-चढाव दिसत आहेत. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 37,875 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर मागील तासांत 369 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात 39,114 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून केरळात कोरोनाबाधितांची 30 हजारांहून अधिक दैनंदिन नोंद करण्यात येत होती. पण, मंगळवारी 25,772 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती, तर 189 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत केरळमध्ये एकूण 42 लाख 53 हजार 298 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा 21,820 वर पोहोचला आहे.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून देशात आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 96 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 41 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाबा म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 22 लाख 64 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 91 हजार 256 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 3,898 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 581 नागरिक कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 63 लाख 4 हजार 336 नागरिकांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 08 टक्के आहे. तर काल दिवसभरात राज्यात 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा डेथ रेट टक्के झाला आहे. राज्यात सध्या 47 हजार 926 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,409 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

तसेच आर्थिक राजधानी मुंबईत काल दिवसभरात 353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 404 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,24,898 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत काल दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3718 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1266 दिवसांवर गेला आहे.