मोदी सरकारकडून किरीट सोमय्यांना CISF च्या ४० जवानांचे सुरक्षा कवच


नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत असल्यामुळे चांगलेच चर्चेत असणारे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या चर्चेचे कारण त्यांनी केलेली टीका नसून त्यांना मिळालेले सुरक्षाकवच आहे. किरीट सोमय्या यांना केंद्रातील मोदी सरकारने झेड सुरक्षा प्रदान केली आहे. आता त्यांच्या सुरक्षेसाठी CISF चे ४० जवान तैनात असणार आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि त्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारकडे त्यांनी सुरक्षेची मागणी केली होती. ही मागणी आता मान्य झाली आहे.

किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासूनच शिवसेनेतील नेत्यांविरोधात मोहीम चालू केली होती. अनिल परब, मिलिंद नार्वेकरांसह महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, तक्रारी दाखल करणे हे सुरूच होते. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. केंद्र सरकारने तात्काळ त्यांची ही मागणी मान्य केली आहे.