गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लसींच्या दोन्ही मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी सक्तीची नाही


मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना सक्तीची नसल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. तर, संबंधित व्यक्ती आणि ग्रामकृती दलांवर याबाबतची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा अथवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यानुसार तपासणीच्या सूचना देखील ग्रामीण भागातील ग्राम कृती दलांना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गावांमध्ये गोंधळ किंवा वाद होण्याची शक्यता होती. रेल्वेस्थानकांवरही काही ठिकाणी आरटीपीसीआर किंवा अ‍ॅन्टीजेन चाचण्यांची व्यवस्था केली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत यांनी हा खुलासा केला.

कोकणात चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने येतात. गेल्या वर्षी या काळात कोरोनाचा उद्रेक जास्त असल्यामुळे त्यांच्यासाठी १० दिवस विलगीकरणासह चाचणीचेही निर्बंध घालण्यात आले होते. यंदाच्या वर्षी कोरोना प्रादूर्भाव लक्षणीय प्रमाणात कमी झाला असल्यामुळे त्याबाबत शिथिलता आली आहे. सर्दी, खोकला किंवा ताप इत्यादी लक्षणे जाणवत असतील, त्यांनी स्वत:हून काळजी घ्यावी. तसेच ग्राम कृती दलाला याची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चाकरमान्यांनी स्वत:हून ग्रामस्थांसह कुटुंबीय सुरक्षित ठेवावे, असे आवाहन सामंत यांनी या संदर्भात केले.