वधू-वर उपस्थित नसतानाही करता येणार लग्नाची नोंदणी


नवी दिल्ली – यापूर्वी वधू-वर दोघांनाही विवाहाची नोंदणी करण्यासाठी नोंदणी कार्यालयात उपस्थित राहावे लागत होते. पण आता केरळ न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. न्यायालयाने असे विशेष विवाह अधिनियमानुसार एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान निर्देश दिले आहेत. आता तंत्रज्ञानाचा वापर दोन्ही पक्षांची ओळख पटवण्यासाठी करता येऊ शकतो, असेही न्यायालयाने सुचवले आहे.

हे निर्देश न्यायमूर्ती महम्मद मुश्ताक आणि कौसर एडप्पागठ यांच्या खंडपीठाने दिले आहेत. फेशिअल रेकग्निशन आणि तत्सम अन्य तंत्रज्ञानाचा वापर पक्षकारांची ओळख पटवण्यासाठी करण्याचे आदेश केंद्र सरकारने द्यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंबंधीही न्यायालयाने सुचवले आहे.

एकल पीठाचे न्यायाधीश पीबी सुरेश कुमार यांच्या निर्णयावर खंडपीठाने सहमती दर्शवली आहे. प्रत्यक्ष वधू-वर उपस्थित नसताना त्यांच्या विवाहाची नोंदणी करता येऊ शकणार आहे. पण, नोंदणी अधिकाऱ्याला या दोघांची ओळख पटवता येणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ओळख कशी पटवता येईल, यावर विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सरकारचे या सुनावणीवेळी म्हणणे होते की, वधू-वर या दोघांनाही विवाह नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहणे गरजेचे असणार आहे. तसेच वधू किंवा वरापैकी कोणी एक विवाह नोंदणी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असायला हवा. यामुळे परदेशातील लोकांची विवाह नोंदणी शक्य नव्हती. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली, तर या निर्णयाचा फायदा बाहेरच्या शहरातील तसेच देशातील जोडप्यांनाही होऊ शकणार आहे.