मंदिराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या सुनावले


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. भाजप आणि शिवसेनेचे नेते यावेळी एका व्यासपीठावर आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला अप्रत्यक्षरित्या सुनावले. भिवंडीतील बंद पडलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात केली होती. या मागणीचा संदर्भ पकडत त्यांनी भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या.

आज राज्यातील मंदिरे जरी बंद असली, तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरे मात्र सुरु आहेत. जनता यासाठी तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळे उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि आरोग्य केंद्र बंद करून त्याच्या बाजूला मी मंदिरे उघडू का? आरोग्य केंद्र आजच्या घडीला महत्त्वाचे आहे. आरोग्याची मंदिरे ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत.

आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम म्हणतो, द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचे रक्षण केलेले आहे. ९२-९३ साली हे आम्ही दाखवून दिले असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले. तुम्ही गाय वासराचा उल्लेख केला. ही काँग्रेसची निशाणी होती. गाय वासरू नका विसरू. तुम्ही अजूनही ती विसरलेले नाहीत. तरी देखील तुम्ही युतीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख केला. बसा एकत्र, काय पाहीजे कल्याण डोंबिवलीला. जे शक्य होईल ते देईल, अशा कानपिचक्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित भाजप नेत्यांना दिल्या.