जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेला राम कदम यांचे खुले आव्हान


मुंबई – तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्य असल्याचे मत आज शिवसेनेने व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपासून जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालेला असतानाच आता शिवसेनेने या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे.

‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे असल्याचे कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित करतानाच मागच्या काळात जो धार्मिक उन्माद ‘बीफ’ प्रकरणावरून घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केले नसल्याचे म्हणत अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीचे असल्याचे मत शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनातून व्यक्त केले आहे. यावरुनच आता भाजप आमदार राम कदम यांनी थेट जावेद अख्तर यांच्या अटकेची मागणी केली आहे.


‘सामना’च्या अग्रलेखामधून शिवसेनेने जावेद अख्तर यांची भूमिका योग्य नसल्याचे म्हटले आहे. राम कदम यांनी हाच लेख ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. जिलेबीसारखी गोल गोल भाषा? एका ठिकाणी शिवसेना मान्य करते आहे की जावेद अख्तर यांनी चुकीचे विधान केले आहे. मग वाट कसली पाहताय? आम्ही तक्रार करून २४ तास होऊनही त्यांना अटक का करत नाही? हिंम्मत असेल तर ठोका बेड्या? त्याच्या घरासमोर, राडा करण्यापासून कोणी रोखले तुम्हाला?, असे प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केले आहेत. जावेद अख्तर यांना माफी मागावी लागेल. त्यांनी भारतातील व्यवहार बघितला आहे. एकदा त्यांनी अफगाणिस्तानला जावे, तालिबानी व्यवहार बघावा. आपोआप त्यांना सद्बुद्धी सुचेल की हात जोडून माफी मागितली पाहिजे, असेही राम कदम म्हणाले आहेत.